शुक्रवार, 6 अप्रैल 2018

काही आठवणी जपून ठेवाव्यात अशा असतात. महाविद्यालयीन जीवनाने बरच काही दिलं. समृद्ध केलं..

गुरुवार, 5 अप्रैल 2018


    " दाखल खारीज " 

वेदनेचा तळ बहरवणारी कविता



मागील एक तपापेक्षा जास्त काळापासून सकस कवितेची नवनिर्मीती करणारे चंद्रपूरातील प्रतिथयश कवी नरेशकुमार बोरीकर यांचा पहिलाच पण बहूचर्चित 'दाखल खारीज' हा दखलप्राप्त काव्यसंग्रह दाखल झाला आहे. त्यानिमीत्य त्यांच्या काव्यप्रतिभेचा घेतलेला हा वेध......

===========================

       

          ग्रामीण साहित्यात ठसकेबाज अनुमान टिपण्याची मोठी ताकद विस्तारत आहे. चार भींतीच्या आत फ्लँटच्या गँलरीत जशी सुखद शब्दकळा दाटून येते तसा गावगाड्याच्या मोकळ्या आकाशात वेदनेचा अंतस्वर दाटून येतो. जगण्या-भोगण्याची लिपी थेट ओठातून कागदावर अवतरते तेव्हा ते शब्द हृदयात 'दाखल' होतात. नंतर कधी 'खारीज' होण्याचा प्रश्नच उदभवत नाही.

          चंद्रपूरातील वाड:मयीन चळवळीत सक्रीय असणारे कवी नरेशकुमार बोरीकर यांचा 'दाखल खारीज' हा कवितासंग्रह दाखल झाला आहे. विदर्भ राज्यातील नामांकीत वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंकातून त्यांची कविता सजग वाचकांच्या पसंतीस यापुर्वीच आली आहे.  अनेक कविसंमेलनातून त्यांची कविता रसिकप्रिय झाली आहे. एकूण ७७ कवितांचा समावेश असणारा हा कवितासंग्रह कवीच्या अनुभवाचं भावविश्व वेदनेच्या तळाशी जावून वाचकांशी संवाद साधते. पहिलाच संग्रह असूनही यातील प्रत्येक कविता प्रगल्भतेच्या अविष्काराने 'फिनिक्स' झेप घेते. नागपूर येथील सुशीला प्रसेनजित गायकवाड यांच्या 'संवेदना प्रकाशनाने' काढलेल्या या दिमाकदार संग्रहाच्या मलपृष्टावर कवयित्री डाँ.पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी अभिप्रायार्थ अगदी मर्मावर बोट ठेवले आहे. 'अनुरागाची विविध रुपे, समाजातील दैन्य, समाजामध्ये राहूनही विकासाच्या गदारोळात हरवलेला माणूस, माणूसकीची झालेली वाताहत, आदिवासींच्या वेदना, शेतक-यांचे दु:ख यात असले तरी विपरित परिस्थितीत जगण्याची बाळगलेली उमेद हेच या कवितांचे वैशिष्ट्य आहे.'

          कवीचे बालपण गावगाड्यात गेल्याने सर्वसामान्यांच्या मुखातील सहज सुंदर व सुलभ बोलीचा प्रभाव कवितेत दिसून येतो. विशेषता कवीचं जीवन अठराविश्वे दारिद्र्यात होळपडून निघाल्याने शब्दही तसे तप्त होवून लाव्हारसासारखे बाहेर पडतात. याचा प्रत्यय कविता वाचतांना वेळोवेळी येतो. तरुणावस्थेत कवीच्या वाट्याला आलेले बेकारीचे भयान दिवस भोगतांना कवितेने जगण्याचा श्वास होवून सावरले असल्याचे कवी अभिव्यक्त होतो. कवितेचं सौंदार्य विषद करतांना कवी लिहतो,

कविता : लिओनार्दोच्या मोनालीसारखी देखणी
कविता : बाबासाहेबांच्या हातातील तळपती लेखणी
कुणासाठी लिहलेली चारोळी असते कविता..
विद्रोहाची ठोकलेली आरोळी असते कविता..

          हल्ली मोठ्या प्रमाणात कवितांचं तणकट वाढत असतांना बोरीकरांची कविता 'कपास' होवून बहरत आहे. तळहाताच्या उभ्या आडव्या प्रारब्धरेषेत दडलेल्या भविष्यापेक्षा कवी मनगटावर विश्वास ठेवून डोळसपणे परिवर्तनाचा विचार करतो. जागतिकीकरणात जवळची माणसे, नाती-गोतीे बदलत चाललीय. झाडे बोन्साय होवू लागली. शेतीत राबणारा ग्रामनाथ आत्महत्येकडे वळत असल्याचे शल्य, सामान्य माणसाचं सोशीत जगणं सातत्याने कवीला अस्वस्थ करतात. कविच्या लिखानाचे विषय वैश्वीक आहे. कवी कुठल्याही बंधनात अडकून पडत नाही. पिंपळाभोवती बेशरम उगवल्याने  स्वार्थी षंडशाहीचा बाजार फोफवल्याचे कवी रोखठोकपणे मांडतो. स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत अजूनही लोकशाही आहे. दडपशाही बंद होईल का ? हा प्रश्न ताजातवाना असतांना 'तिरंगा' या कवितेत परिस्थितीपुढे कवी खजील होतो.

सा-यांची नजर दिमाकात फडकणा-या तिरंग्यावर
मी मात्र तिरंगा पाहत होतो
तीन जागी 'डंड' केलेल्या मायच्या लुगड्यावर
अन् अशोकचक्र मातीत राबणा-या बापाच्या बरगड्यांवर...

          कवी हा पेशाने शिक्षक आहे. पहाडातील आदीवासीबहूल विद्यार्थ्यांपुढे शिकवतांना त्यांच्या कवितेला वेगळाच अलवार नाद, गंध, स्पर्श, लय, सुर, गवसला आहे. या संग्रहातील ब-याच कविता मुक्तछंदातील असून अल्पाक्षरी आहेत. काही मुक्तकं, अभंग सदृश्य रचनांचाही समावेश आहे. सुरेश भटांच्या गझलेने उभ्या महाराष्ट्राला, साहित्य विश्वाला वेड लावले असतांना त्यात कवी बोरीकरही अपवाद नाही. तंत्रशुद्ध नसल्या तरी भावनीक पातळीवर मोठी उंची गाठणा-या रचना त्यांनी सुरेख केलेल्या आहेत. कवीचा पिंड निसर्गात वाढल्याने त्याचा प्रभाव सातत्याने कवितेत जाणवतो. कोपर्सीच्या जंगलात २७ मार्च २००१ रोजी पोलीस एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला कथित नक्षलवादी चिन्ना वट्टे मट्टामी याचं स्वगत असणारी 'मी चिन्ना बोलतोय..!' ही कविता विदारक वास्तव मांडते. अंधश्रद्धेविरुद्ध प्रबोधन घडवणारी 'पायरीचा दगड', ढाण्या वाघाची शेतक-यांसाठी वापरलेली प्रतिमा दर्शवणारी 'वावर', मायेची व्यथा मांडणारी 'माझी माय', स्त्री-पुरुष संबंधातील तडजोड 'किणकीण',  कौर्याची परिसीमा ओलांडणारी 'गुरुदक्षिना' आदी कविता वेगळ्या धाटणीच्या असून अर्थवाही व अंतर्मुख करणा-या आहेत. प्रेम, विद्रोह, शृंगार यांचा त्रिवेणी संगम आहे.

          कवी नरेशकुमार बोरीकर हे अतिशय संवेदनशील आहे. मुखवट्यामागील चेहरा शोधण्याची व ओळखण्याची प्रतिभा त्यांना सभोवतालच्या वातावरणाने दिली आहे. हा संग्रह त्यांनी आपल्या दोन्ही  बहीणींच्या 'उपाशीपोटी केलेल्या जीगरबाज संघर्षास...' अर्पण केलेला आहे. यातील बरीच कविता कविच्या जगण्यातली खदखद आहे. त्यातून बोध घेवून कवी लिहतो,

मी जराशी घेतली ही  आसवे डोळ्यामध्ये...
का कशी पण पेटली ही आसवे डोळ्यामध्ये...

          प्रस्तुत कवितासंग्रहाला प्रसिद्ध कवी, चित्रपट दिग्दर्शक द्यानेश वाकुडकर यांची दखलप्राप्त प्रस्तावना लाभली आहे. संग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ कवी बंसी कोठेवार यांनी कलात्मकतेने साकारले असून संग्रहाच्या आतील कवितांना देखील रेखाचित्राद्वारे आटोकाट न्याय दिला आहे. कवी नरेशकुमार बोरीकर यांनी जे उघड्या डोळ्यांनी जगलं, भोगलं, अनुभवलं ते अस्सलपणे अभिव्यक्त केले आहे. ख-या अर्थाने वेदनेचा तळ बहरवणारी ही कविता आहे. मराठी कवितेला समृद्ध करण्यासाठी हा अक्षय संग्रह 'दाखल' झाला आहे. रसीक, वाचकांनी आवर्जून वाचावा, कारण यातील कविता 'खारीज' होणे शक्य नाही एवढं हमखास...!

-अविनाश पोईनकर,

रा.बिबी, ता.कोरपना, जि.चंद्रपूर

संपर्क :- ७३८५८६६०५९


==========================

कवितासंग्रह : दाखल खारीज
कवी            : नरेशकुमार बोरीकर
प्रकाशन       : संवेदना प्रकाशन,नागपूर
मुखपृष्ठ        : बंसी कोठेवार
मुल्य            : १२० रुपये
पृष्टे              : ८०
===========================



शेती काय असते
कधी कळलंय तुला ?
कधी समजून घेतलंय
कास्तकाराचं जीणं..?

तु फक्त भाव ठरव
आम्ही पिकवलेल्या जींदगीचा
तु गॅलरीतून पाऊस बघ
आमच्या रक्तबंबाळ घामाचा
तु व्यवसाय सुद्धा कर
आमच्या छाती-मातीचा

काय ठेवलंय रे शिल्लक
धु-यावर फक्त एक झाड
की उभ्या देहाचा झुला
तु विसरलास
तुझं पोट मातीचंच मुला...

-अविनाश पोईनकर
 7385866059


बुधवार, 4 अप्रैल 2018


काही प्रसंग आनंददायी असतात नेहमी...



















माझ्यातली कविता, कलावंत, हळवा माणूस..
तुला कधीच पटलो नाही मी
तू कधीच केली नाहीस माझं कौतूक
कधीच उघडून बघितलं नाहीस
माझ्यातलं संवेदनशील मनाचं पुस्तक

तू जगत आलीस एकाकी
तसं एकाकी समजू लागलीस तुझं जग
तू खपलीस, धडपडलीस, शिकलीस
म्हणून खंबीर होत गेलीस प्रत्येक वळणावर..

तू हुंदक्याचं केली नाहीस कधी भांडवल
आणि मी चुकत गेलो तिथेच
तू वाचत गेलीस माणसांना
आणि मी वाचत सुटलो पुस्तके..

तू कधीच मिरवली नाहीस चारचौघीत
आणि मी फुलांच्या गर्दीत बेधूंद
तू अव्यक्ततेतून गुंफत गेलीस माळ
आणि मी अभिव्यक्तीचे पिटत गेलो कंगोरे

तू वाढलीय साहित्याच्या आवरणात
मग तुझ्यातूनच का हरवत चाललंय साहित्य ?

-अविनाश पोईनकर

============================

(4 APRIL 2018)


💕तुझ्यासाठी जीव...

========================

धडधड करताहे ह्या ह्रदयाच्या नसा
तुझ्यासाठी जीव गडे झाला वेडा पिसा

ओठाची गं पडझड जिभेवर नाव
पापणीच्या काठावर ओलावते भाव
मोकळे ते खुलणारे मोरपंखी केस
भास जसा गालावर हात लावतेस
दूर नको जावू संग राहण्याचा वसा...

भेटलीस जशी जणू विचाराचे थवे
भले बुरे भान संगे जगण्याला हवे
हातामध्ये हात गडे मुठीमधी जान
आणि तुझा माझा बहरावा स्वाभिमान
जिंदगीच्या मातीवर पावसाचा ठसा...


झुळझुळ वा-याचे ते संगीत बावरे
श्वास माझा सैरावैरा तुझ्यासाठी बरे
आडोश्यात लाजतेस संसाराची आस
जुळू दे गं तुझी माझी जन्मोजन्मी रास
अंतरंग शहारले बघ मनाचा आरसा...

 -अविनाश पोईनकर   

  बिबी, जि.चंद्रपूर    

   ७३८५८६६०५९




==========================

माझा महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने 'उजेड मागणारी आसवे' कवितासंग्रह आगष्ट 2017 मध्ये प्रकाशित झाला. चंद्रपूर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्याचे इलेक्ट्रनिक मिडीयाने घेतलेली दखल...

मैत्रीचं_हिरवं_झाड
====================

तुझ्या आणि माझ्या मनात
वाढतेय मैत्रीचं हिरवं झाड
मुळं घट्ट विस्तारतेय खोलवर जमीनीत..!

उमलत्या डहाळ्यांना
दिवसेंदिवस स्फुरतोय विश्वासाचा गंध
अपेक्षांच्या पलीकडे
वाहतोय आपुलकीचा निर्मळ झरा..

उन्ह वारा पाऊस सोसून
दुष्काळातही डौलाने उभं असतं झाड
पडझडीत सोडत नाहीत मुळं जमिनीला
तसा तू सोडला नाहीस कधी हात.

झाड अविरत देताहेत जगण्याला शुद्ध हवा
तसा तू माझा 'आॅक्सीजन' झालास
धुप होवू नये मातीची म्हणून
झाड घालतो नकळत पांघरून
तसा तू माझा आभाळ झालास

स्वाभिमान-अभिमान, सुकाळ-दुष्काळ
या मनस्थितीत कधीच उभं नसतं झाड.
तु ही कधी राहीला नाहीस; राहू दिला नाहीस!

प्रेमाच्या ओलाव्यात कधीच उल्मळत नाही झाड
तसं उल्मळणार नाही कधीच आपलं नातं.

मित्रा तू जिंकलास
तुझ्या सहवासात बहरुन आलयं झाड !

       -अविनाश पोईनकर
          बिबी, जि.चंद्रपूर

=============================



झोप उडावी असे काहीसे...
========================

झोप उडावी असे काहीसे स्वप्न पडावे
काळोखाला मुठीत घेऊन विघ्न स्मरावे

तळपायाची आग जाहते झीज नसावी
उकिरड्यावर पोट रांगते भुक मसावी
कुणबी माती फळली नाही काय करावे ?
झोप उडावी असे काहीसे स्वप्न पडावे...

गाव पांगला दणकट हाडे ठिसूळ झाली
जन्म कोपला जणू लेकरे उदंड भ्याली
वाटाघाटीत प्रतिभेचे का सृजन मरावे ?
झोप उडावी असे काहीसे स्वप्न पडावे...

चहू दिशांनी बाजाराला खिडक्या दारे
विकार आले यंत्र फेकले तू विकले वारे
माती सोडून आकाशाचे का बोट धरावे ?
झोप उडावी असे काहीसे स्वप्न पडावे...

दुःख पांघरूण प्रदर्शनाचा ग्लोबल सूर्य
रे अस्सलतेचा ध्यास पुरेसा आतून ध्येर्य
अवखळ रस्ता काटे वेचत का झोपी जावे ?
झोप उडावी असे काहीसे स्वप्न पडावे...

- अविनाश पोईनकर
    बिबी, जि. चंद्रपूर
    ७३८५८६६०५९

==========================


दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....