सोमवार, 27 मई 2019

'स्मार्ट व्हिजन' : जग जोडणारे संवादसेतू !


भूतलावर सर्वात बुद्धिमान समजला जाणारा मानव तंत्रज्ञानाच्या दिशेने सतत आगेकूच करत आहे. 'हम किसीसे कम नही' हे सिद्ध करण्यात माणसाने कुठेही कसर सोडली नाही. मानवी उत्क्रांतीच्या कालखंडापासून आजतागायत 'माणूस' म्हणून केलेली प्रगती जगाला दिशादर्शक ठरली. आधुनिक कालखंडात जगतांना पुढच्या शंभर वर्षाचे भाकीत आज सहज वर्तवणे मानवी बुद्ध्यांकाला कठीण नाही. सारं काही 'डिजीटल' होत असताना जगाला एकसंध जोडणाऱ्या संवादसेतूंना जन्म देऊन माणूस 'स्मार्ट' झाला आणि त्याचे 'व्हिजन' देखील 'स्मार्ट' झाले.

जंगलात झाडाच्या खांद्याचे घर्षण झाले किंवा दगडाला दगडांचे घर्षण केले की त्यातून 'अग्नी' तयार होतो, ही समज मानव सृष्टीला कलाटणी देणारी ठरली. माणूस प्रयोगशील झाला. काळानुसार बदलत राहिला. अत्यावश्यक साधनांना अशाच प्रयोगातून मूर्त रूप देत गेला. परिणामी याच माणसात 'शास्त्रज्ञाचा' जन्म झाला. हळूहळू जमिनीपासून अवकाशापर्यंत बदलचक्र सुरू झाले. या बदलचक्रातून आपण आजचे नवे विश्व अनुभवत आहोत.

इंटरनेटच्या माध्यमातून झालेली संगणक क्रांती आश्चर्यकारक ठरली. माणूस हा नवनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरला. नवनिर्मितीच्या आविष्कारात हल्ली जग जोडणाऱ्या संवादसेतूत प्रत्येकाला एक चेहरा मिळाला तो लोकप्रिय 'फेसबुक'मुळे. फेसबुकवर नसणारा माणूस तसा विरळच. मार्क झुकरबर्ग यांनी निदान प्रत्येक माणसाला ५००० मित्र या माध्यमातून जोडण्याचे सहज साधन उपलब्ध करून दिले. शहरात माणूस माणसाला ओळखत नाही. एकाच अपार्टमेंटमध्ये राहून शेजार्‍यांचे दार शेजा-यांसाठी नेहमी बंद असते. समोर माणूस असला तरी एकमेकांशी फारसा संवाद होत नाही. या अवस्थेत माणसाच्या मनाची दारे सोशल मीडियावर उघडी झाली.

देशात ८० टक्के पेक्षा जास्त लोक 'स्मार्टफोन' वापरतात. एकाच कुटुंबातील सर्वच सदस्यांकडे देखील ब-याच ठिकाणी 'स्मार्टफोन' आहेत. पहिल्या वर्गापासून कॉन्व्हेंट, जिल्हा परिषद शाळेतसुद्धा संगणकाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत असल्याने हा स्मार्टफोन लहान मुलांचा 'आवडीचा मित्र' झाला. आई वडील शिकवायच्या अगोदरच मुलाला 'स्मार्टफोन' समजतो. शाळेची शैक्षणिक माहिती व अभ्यासक्रम मुलांना स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने पुस्तकांपेक्षा स्मार्टफोनचे आकर्षण त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. स्पर्धापरीक्षेची तयारी करणारी मुले यावरच बराच वेळ रोज 'जनरल अपडेट' होतात. बऱ्याच ठिकाणी नोकरी करणारे, व्यवसाय करणारे आपापल्या पद्धतीने कामे स्मार्टफोनवर घरबसल्या करतात.

कुठल्याही विषयाची माहिती आपल्याला हवी असेल तर लगेच आपण 'गुगल सर्च' करतो. आजची देशात महत्त्वाची घटना काय? जाणून घ्यायचे असेल तर 'ट्वीटर' खोलले की लगेच आपल्याला 'नोटिफिकेशन' मिळते. 'व्हाट्सअॅप'मुळे समाज जीवनाचा धागा प्रत्येक माणसाला गवसला. युट्युबवर प्रत्येक विषयावर जगभरातील व्हिडिओ सहज पाहता येतात. लींकेड, ई-मेल, इंस्टाग्राम, ब्लॉगर यामुळे प्रत्येक माणसाशी आपल्याला संपर्क साधता येतो. व्यक्तीची माहिती मिळवता येते. प्रत्येकाच्या वैयक्तिक, सार्वजनिक, व्यवहारिक जीवनात बदलत्या काळाने आमूलाग्र बदल घडवून आणला. विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा महाचमत्कार वगैरे मी म्हणणार नाही पण मानवी संवेदनेच्या प्रगल्भतेचा हा अविष्कार आहे, असे नक्कीच म्हणेल.

अक्षय नावाचा माझा गावातील २० वर्षाचा एक तरुण मित्र आहे. तो मोटार लाईनमध्ये आला, पट्ट्याने कार घेतली. ओला, उबेर या कंपन्यांमध्ये पुण्या-मुंबईतील शहरात त्याची कार धावते. मात्र त्याचे वाहन कुठे आहे? व्यवसाय किती झाला? हे त्याला घर बसल्या मोबाईलवरच कळते. असे कित्येक व्यवसाय आज ऑनलाईन झालेत. आर्थिक विश्वसनीयता वाढली.

आपण रोजच्या जीवनमानाकडे एक नजर टाकली की बरेच काही बदलले वाटते. आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी बदलल्या. शेती-माती, घर, चलनातील नोटा देखील बदलल्या. या बदलाला आपण स्वीकारले आहे, अर्थात आपण डिजिटल झालो आहे. आपले गाव देखील 'स्मार्ट' होण्याची तयारी करीत आहे. चौकाचौकात नजर ठेवण्यासाठी डिजिटल कॅमेरे आपल्याला सहज दिसतात. पाचव्या, सातव्या वर्गात शिकणारा पोरगा उन्हाळ्याच्या सुट्टीत 'कॅम्प्युटर क्लासला' जातो असे सांगतो तेव्हा ग्लोबल जगाचा  अशिक्षित आई-वडिलांना देखील अंदाज येतो.

आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहे.   समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा आदी क्षेत्रात टिकायचे असेल तर इतरांपेक्षा आधी स्वतःशी स्पर्धा, संघर्ष करून सोशल मीडियातून समाजाभिमुख व्हावे लागेल. माहितीचा प्रसार व  प्रचाराची साधने उपलब्ध असल्याने जग जिंकण्याची ताकद कित्येकात संचारली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे बराक ओबामा ही नावे जेवढ्या सन्मानाने ज्या त्या देशात घेतली जातात त्यापेक्षा जास्त जगभरात चर्चेत असतात. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून असाध्य ते साध्य | करिता सायास || ही संत तुकोबांची ४०० वर्षापूर्वीची भविष्यवाणी माणसाने खरी ठरवली आहे.

डिजिटल क्रांती ही कुठल्याही एका प्रवाहापुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रशासकीय कामाला गतीशील वळण देणारी ठरली. शेतीत अमुलाग्र प्रयोग करून उत्पन्नवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. अवकाशातील वातावरणाचा अंदाज, भूगर्भातील हालचाली टिपण्यास सक्षम पर्याय ठरली. ग्राहम बेल, थॉमस एडिसन यांनी हजारदा प्रयोग करून 'व्हिजन' गाठणारी ठरली. 'प्रयत्नांती परमेश्वर' शिकविणारी, मानवी मनाचा विचार सर्वदूर पसरविणारी टेक्नॉलॉजी शेवटी मानवी मनाच्या मेंदूतून बाहेर पडल्याने सकारात्मकतेचा विचार पेरणारी ठरली.

एकंदरीत सर्व समाज माध्यमाने जगाला, समाजाला जवळ आणले. 'व्हिजन' ठेवून काम करण्यास भाग पाडले. वेळ वाचला. मनुष्यबळ कमी झाले. कामे हलकी झाली. यातून मानवी गरजांना आवश्यक साधनांचा विकास झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम नाकारता येत नाही. या सर्व बाबींबर बारकाईने लक्ष ठेवून याचे 'सोशल ऑडिट' प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. हल्लीच्या जमान्यात प्रत्येकाने आपले 'व्हिजन' नक्कीच ठरवावे. मात्र व्हिजन अधिक 'स्मार्ट' होण्यासाठी या जग जोडणाऱ्या 'डिजिटल संवादसेतू' शिवाय पर्याय नाही एवढे नक्की !



-अविनाश पोईनकर, चंद्रपूर
मोबा. ७३८५८६६०५९
ई-मेल- avinash.poinkar@gmail.com

======================

बुधवार, 15 मई 2019

राजू केंद्रे : वळवळ आणि चळवळीतून प्रेरणा देणारा कलंदर

• समाजभान - १


राजू केंद्रे : वळवळ आणि चळवळीतून प्रेरणा देणारा कलंदर
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


(झाडी प्रदेश व पर्यायाने विदर्भात नवी पिढी विविध क्षेत्रात काम करीत आहे. सामाजिक चळवळी व प्रवाहातून काही तरुण समाज परिवर्तनाच्या लढाईत थेट प्रबोधनाचा वसा घेत आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचं निर्मळ रूप साकारू पाहत आहेत. अशा पडद्यामागच्या तरुणाईच्या कर्तुत्वाची ओळख यानिमित्ताने उलगडता यावी म्हणून हे 'समाजभान' सदर.....)

•••


              प्रत्येक वेळेस तरुणांना शिवी हासडणारी मंडळी समाजात काही कमी नाही. 'तुला काय कळतं ?' हा शिक्का कित्येकांना तरुणाईच्या कपाळावर कोरावा वाटत असेल. पण ही तरुणाई गुलाम नाहीत. तरुणाईची भाषा हीच समाजाची खरी चेतना. वळवळ केल्याशिवाय चळवळ उभी होत नाही, चळवळीतून उभे होणारेच खरे कलंदर असतात. पर्यायाने समाजाला प्रेरणा देतात.

                   राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे, वय वर्षे २५. समाज हा या तरुणाचा आत्मा. परिवर्तन हे त्याचे ध्येय. गोष्ट छोटी डोंगराएवढी असे त्याचे कर्तृत्व. विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील  लोणार तालुक्यात पिंप्री (खंदारे) या छोट्याशा गावातून पुढे सरसावलेला हा तरुण. शेतकरी कुटुंबातून धडपडणारा राजू आज समाजातील विविध प्रवाहांना फक्त स्पर्श करत नाही तर संवेदना ओळखून थेट काम करतो. देशात नामांकित तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये (TISS) 'ग्रामिण विकास' विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला राजू स्वतःच्या गावापासून सुरुवात करून इतर गावात विकास प्रक्रियेचे धोरण आखतो. संपूर्ण राज्यात सोशल मीडियातून विधायक कामासाठी समविचारी युवकांची चळवळ उभी करतो. गावागावात वाचनालये निर्माण करतो. मेळघाटातील कोरकू आदिवासींचं सक्षमीकरण असो की चोर समजल्या जाणाऱ्या पारधीबेडा येथील लोकांना आत्मनिर्भर करणे असो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा तरुण शिक्षणासोबत सतत धडपडत आहे.

             दोन वर्षांपूर्वी राजू सोबत झालेली ओळख आणि त्याचं जवळून पाहिलेलं काम त्याच्या वयाला दुप्पट करणार होतं. दहावीत ८७% टक्के घेऊन बुलढाणा येथे शिक्षणासाठी आल्यावर राजूला आधी डॉक्टर होवून समाजासाठी झिजावं वाटलं. 'ताई मी कलेक्टर व्हयनू' हे पुस्तक वाचल्यावर यूपीएससी करून प्रशासनात यावं वाटलं. त्याच कोवळ्या वयात डॉ. प्रकाश आमटे यांचं 'प्रकाशवाटा', चंद्रकांत वानखेडे यांचे 'आपुलाची वाद आपणाशी', एकनाथ आव्हाड यांचे 'जग बदल घालुनी घाव', पी साईनाथ यांचे 'दुष्काळ आवडे सर्वांना' यासह मनाला चेतवणारी पुस्तके वाचून काढली.  पुस्तकातून माणूस घडतो तसा राजू घडत गेला. सतत वेगवेगळे प्रयोगशील उपक्रम राबवून काम करीत राहिला.

           राजू ची काम करण्याची पद्धत फार निराळी आहे. वयाच्या विशीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथे काही मित्रांसह बालमृत्यू व कुपोषणमुक्तीवर काम करण्यासाठी 'मेळघाट मित्र धडक मोहीमेत' २०१२ साली सहभाग घेतला. अजूनही प्रत्येक पावसाळ्यात राज्यभरातील तरुण धडक मोहिमेत सहभागी होऊन जमेल ते करतात. धडक मोहीम म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं एक मुक्त विद्यापीठ. २० वर्षापासून सुरू असलेल्या या मोहिमेचा राजू सात वर्षांपासून समन्वयक आहे. यात हजार पेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवला आहे. बालमृत्यू, कुपोषण सोबतच राजू ने हाती घेतले ते लोकांचे प्रश्न. यासाठी आंदोलने केली. वारंवार बैठका घेतल्या. न्याय व हक्कासाठी माहितीच्या अधिकाराचे शस्त्र वापरले. ग्रामसभा सक्षमीकरण, हक्काच्या शासकीय योजना, रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी राजू प्रत्यक्ष राबत आहे. आदिवासी संस्कृती त्यांचा सच्चेपणा राजूसह धडक मोहिमेत सहभागी युवकांच्या जीवनात परिवर्तन करणारे ठरले.

              'हात लगे निर्माण में, नही मागणे नही मारणे' या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील सोमनाथ शिबिरासह राजूने देशभरातील ५० पेक्षा जास्त विविध विषयावरील शिबिरात सहभागी होऊन स्वतःचा वैचारिक बाज काबीज केला. हल्ली तरुणांना तयार करण्यासाठी राजू स्वतः शिबिरे आयोजित करतो. देशातील निवडक युवकांसह जागृती सेवा संस्थेकडून भारतभर जागृती यात्रेत राजूचा सहभाग होता‌. देशातील सामाजिक प्रवाहांना वळण देणारे वेगवेगळे स्थळ, व्यक्ती यांच्या भेटीगाठी घेत, चर्चा करत राजूची वैचारिक जडणघडण भक्कम झाली आहे.

            राजूने 'मुख्यमंत्री फेलोशिप' च्या माध्यमातून दीड वर्ष यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील इंद्रठाना ग्रामपंचायत अंतर्गत 'पारधीबेडा' येथे केलेले काम उल्लेखनीय आणि दिशादर्शक ठरले. जन्मजात चोर व गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या पारधी समाजातील या वस्तीत कधी प्रशासन पोहोचले नाही. तेथील भकास चित्र पाहून राजू अस्वस्थ व्हायचा. पारधी बेड्यातच राजूने मुक्काम ठोकला. ही साधी भोळी माणसं किती प्रेमळ आहे, आणि लोक यांना चोर का समजतात ? हा माणुसकीला गहिवर आणणाऱ्या प्रश्नासह राजूने पुढचे पाऊल टाकले. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, शासकीय योजना थेट या लोकांपर्यंत पोचवणे, माहिती देणे हे राजूचे नित्यक्रम. ३१ डिसेंबरच्या रात्री 'थर्टी फर्स्ट पार्टी' ही दारूने नव्हे तर दूध पिऊन पारधीबेड्यात राजूने साजरी केली. कु.श्वेता रंगारी ही दहा वर्षाची चौथ्या वर्गात शिकणारी मुलगी. राजूच्या स्वच्छ संस्काराने तिने आपल्या वडिलांपुढे हट्ट धरला, 'बाबा, जोपर्यंत तुम्ही घरी शौचालय बांधणार नाही तोपर्यंत मी शाळेत जाणार नाही.' मुलीच्या हट्टापायी वडिलांना शौचालय बांधावे लागले. हे यश आहे राजूच्या कार्यपद्धतीचे. अंजूता भोसले हिची ही अशीच कहाणी. पारधी समाजातील ती पहिली 'एस.टी चालक' म्हणून नोकरीस लागली.  पारधीबेड्याच्या जागेचा प्रश्न, शाळा, अंगणवाडी राजूने आपल्या संकल्पनेतून अत्याधुनिक केले. गावाचा विकास फक्त रस्ते आणि गटारीतून होत नाही तर मानवी मनाच्या विकासातून होतो हे राजू ने सिद्ध केले. राजूच्या प्रयत्नानेच आज पारधीबेड्यात प्रशासन थेट पोहोचले आहे.

              महात्मा गांधींनी म्हटले होते, 'लोकांकडून आधी शिका. लोकांसाठी नाही तर लोकांसोबत काम करा.' या वाक्यावर राजूचा ठाम विश्वास आहे. वयाच्या बावीशीत ग्रामीण विकासाचे शिक्षण घेतल्यावर स्वत:च्या गावात काम करावं, या उद्देशाने ऑगस्ट २०१५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्याचे ठरवले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पुढाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. गावातील राजकारण आणि गटबाजी तसे सामाजिक प्रतिष्ठेचे विषय. युवकांचे आदर्श गाव पॅनल उभे केले. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कामाचा जाहीरनामा लिहून राजूने ग्रामपंचायतीला दिला. 'आम्ही राजकारण नव्हे समाजकारणातून गावाचा कायापालट करू' या उद्देशाने स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा लिहून देणारी पिंप्री ग्रामपंचायत निवडणूक ही राज्यात पहिली ठरली. राज्यभरातील मित्रांनी या तरुणांना निवडणुकीसाठी मदत केली. राजू आणि त्याचे युवकांचे पॅनल मात्र या राजकारणाच्या खेळात बळी ठरले. निवडणूक हरले, पण राजू हरला नाही. तरुणातील नेतृत्वाच्या विकासासाठी तो अजूनही झटत आहे.

           सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षणातूनच पुढे येऊ शकतात. शिक्षणासाठी काम करावं, यासाठी राजूने 'एकलव्य' नावाची चळवळ उभी केली. त्याची सुरुवात स्वतः गावात सहा-सात वर्षांपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व युवक वर्गासाठी घरी छोटसं ग्रंथालय सुरू करून केली. राजूच्या कार्यपद्धतीवर राज्यातील युवकांचा विश्वास असल्याने एक नवी फळी 'एकलव्य' च्या माध्यमातून राज्यभर उभारण्यात राजूला यश आले. युवकांना घेऊन 'पुस्तक संकलन केंद्र' उभे केले. यवतमाळ, पुणे, मुंबई, औरंगाबाद, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, अमरावती या शहरात एकाच दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून ३० हजार पुस्तके गोळा केली. यातून राजूने तीस गावात वाचनालये उभी करण्यासाठी पुस्तके देऊन सहाय्य केले. सहा शाळा डिजिटल करण्यासाठी मदत केली आहे. यंदा एक लाख पुस्तके गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. याची दखल म्हणजे एकलव्य मॉडेलला 'पीपल चॉईस अवार्ड' ने देखील महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. 

               राजू हा सध्या यवतमाळ येथील सावित्री ज्योतीबा समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतोय. येथेही त्याने दोन वर्षा आधी एकलव्य अकादमीची सुरुवात केली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढावा, समाज परिवर्तनासाठी तरुण कार्यकर्ते निर्माण करावे यासाठी 'एकलव्य' ही महाराष्ट्रात चळवळ म्हणून आता उदयास येत आहे. आर्थिक दुर्बलता, पालकांचे ठराविक करियर बाबत अट्टाहास व इतर कारणे ओळखून एकलव्य अकादमी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'सपोर्ट सिस्टीम' म्हणून राज्यभर काम करत आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे देशातील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि शैक्षणिक सस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यसाठी एकलव्य टीम मदत करत आहे. जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT) मधील सामाजिक विज्ञान आणि मानव विद्याशाखा भारतीय, दिल्ली विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई, अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरू, कर्वे समाजकार्य संस्था पुणे, निर्मला निकेतन मुंबई, गांधी रिसर्च सेंटर या नामांकित महाविद्यालये, विद्यापीठात एकलव्य चे विद्यार्थी प्रवेश घेऊन यशस्वी होत आहे. पहिल्या बॅच मध्ये ७ विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरू येथे पाठवण्यात यश आले. दुसर्‍या बॅच मध्ये ६० विद्यार्थ्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरुसाठी प्रवेश परीक्षा दिली. जवळपास ३० विद्यार्थांनी या संस्थांमध्ये प्रवेश मिळवला. २० विद्यार्थी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि १० अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूरु येथे निवड झाले. १५ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. नवीन बॅच मध्ये ७५ पेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत आहे. ग्रामीण तरुणांना दर्जेदार आणि  रोजगारक्षम शिक्षणाची गरज ओळखून राजूने घेतलेला पुढाकार सच्चा शैक्षणिक प्रबोधनकाराचं द्योतक आहे. पुढील दशकभरात एकलव्य अकादमीच्या माध्यमातून किमान २००० समाजाचे डॉक्टर,  विकासाचे दूत उच्च शिक्षण घेऊन स्वतः घडतील व समाजाला घडवून एकलव्याच्या चळवळीत वाटा उचलतील, असे राजू बोलून दाखवतो.

               वयाच्या पंचविशीत काम करणारा हा कार्यकर्ता परिस्थितीचे कारणे सांगत बसत नाही.  प्राध्यापकी करताना त्याचे सामाजिक भान चौफेर असते. मागील वर्षी केरळ येथे झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रा.दरणे व ८५ विद्यार्थ्यांच्या टीमसह राजू धावून गेला. दोन आठवडे पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. यवतमाळातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळ हा पाण्याशी निगडित असणारा प्रश्न. यंदा सहा तालुक्यातील बारा गावात ७० विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पाणी फाउंडेशनच्या  मोहिमेत फावडी, कुदळ हातात घेऊन स्वतः श्रमदान केले. साहित्य संवर्धनाच्या बाबतीतही राजू चे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यंदा यवतमाळ येथे पार पडलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात राजूचा सक्रिय सहभाग होता.  ३०० स्वयंसेवकांच्या सहाय्याने 'स्वयंसेवक समिती प्रमुख' म्हणून संमेलनाच्या यशस्वीतेत खारीचा वाटा उचलला. राजूला अजून बराच पल्ला गाठायचाय. संताच्या भूमीचा सजग वारसा विचार आणि कृतीतून राजू सारखे असंख्य तरुण संवर्धन करीत आहे. गरज आहे समाजाने त्यांना पाठबळ देण्याची !



-अविनाश पोईनकर
    बिबी, चंद्रपूर
मोब. ७३८५८६६०५९
avinash.poinkar@gmail.com

===========================

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....