" दाखल खारीज "
वेदनेचा तळ बहरवणारी कविता
मागील एक तपापेक्षा जास्त काळापासून सकस कवितेची नवनिर्मीती करणारे चंद्रपूरातील प्रतिथयश कवी नरेशकुमार बोरीकर यांचा पहिलाच पण बहूचर्चित 'दाखल खारीज' हा दखलप्राप्त काव्यसंग्रह दाखल झाला आहे. त्यानिमीत्य त्यांच्या काव्यप्रतिभेचा घेतलेला हा वेध......
===========================
ग्रामीण साहित्यात ठसकेबाज अनुमान टिपण्याची मोठी ताकद विस्तारत आहे. चार भींतीच्या आत फ्लँटच्या गँलरीत जशी सुखद शब्दकळा दाटून येते तसा गावगाड्याच्या मोकळ्या आकाशात वेदनेचा अंतस्वर दाटून येतो. जगण्या-भोगण्याची लिपी थेट ओठातून कागदावर अवतरते तेव्हा ते शब्द हृदयात 'दाखल' होतात. नंतर कधी 'खारीज' होण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
चंद्रपूरातील वाड:मयीन चळवळीत सक्रीय असणारे कवी नरेशकुमार बोरीकर यांचा 'दाखल खारीज' हा कवितासंग्रह दाखल झाला आहे. विदर्भ राज्यातील नामांकीत वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंकातून त्यांची कविता सजग वाचकांच्या पसंतीस यापुर्वीच आली आहे. अनेक कविसंमेलनातून त्यांची कविता रसिकप्रिय झाली आहे. एकूण ७७ कवितांचा समावेश असणारा हा कवितासंग्रह कवीच्या अनुभवाचं भावविश्व वेदनेच्या तळाशी जावून वाचकांशी संवाद साधते. पहिलाच संग्रह असूनही यातील प्रत्येक कविता प्रगल्भतेच्या अविष्काराने 'फिनिक्स' झेप घेते. नागपूर येथील सुशीला प्रसेनजित गायकवाड यांच्या 'संवेदना प्रकाशनाने' काढलेल्या या दिमाकदार संग्रहाच्या मलपृष्टावर कवयित्री डाँ.पद्मरेखा धनकर-वानखेडे यांनी अभिप्रायार्थ अगदी मर्मावर बोट ठेवले आहे. 'अनुरागाची विविध रुपे, समाजातील दैन्य, समाजामध्ये राहूनही विकासाच्या गदारोळात हरवलेला माणूस, माणूसकीची झालेली वाताहत, आदिवासींच्या वेदना, शेतक-यांचे दु:ख यात असले तरी विपरित परिस्थितीत जगण्याची बाळगलेली उमेद हेच या कवितांचे वैशिष्ट्य आहे.'
कवीचे बालपण गावगाड्यात गेल्याने सर्वसामान्यांच्या मुखातील सहज सुंदर व सुलभ बोलीचा प्रभाव कवितेत दिसून येतो. विशेषता कवीचं जीवन अठराविश्वे दारिद्र्यात होळपडून निघाल्याने शब्दही तसे तप्त होवून लाव्हारसासारखे बाहेर पडतात. याचा प्रत्यय कविता वाचतांना वेळोवेळी येतो. तरुणावस्थेत कवीच्या वाट्याला आलेले बेकारीचे भयान दिवस भोगतांना कवितेने जगण्याचा श्वास होवून सावरले असल्याचे कवी अभिव्यक्त होतो. कवितेचं सौंदार्य विषद करतांना कवी लिहतो,
कविता : लिओनार्दोच्या मोनालीसारखी देखणी
कविता : बाबासाहेबांच्या हातातील तळपती लेखणी
कुणासाठी लिहलेली चारोळी असते कविता..
विद्रोहाची ठोकलेली आरोळी असते कविता..
हल्ली मोठ्या प्रमाणात कवितांचं तणकट वाढत असतांना बोरीकरांची कविता 'कपास' होवून बहरत आहे. तळहाताच्या उभ्या आडव्या प्रारब्धरेषेत दडलेल्या भविष्यापेक्षा कवी मनगटावर विश्वास ठेवून डोळसपणे परिवर्तनाचा विचार करतो. जागतिकीकरणात जवळची माणसे, नाती-गोतीे बदलत चाललीय. झाडे बोन्साय होवू लागली. शेतीत राबणारा ग्रामनाथ आत्महत्येकडे वळत असल्याचे शल्य, सामान्य माणसाचं सोशीत जगणं सातत्याने कवीला अस्वस्थ करतात. कविच्या लिखानाचे विषय वैश्वीक आहे. कवी कुठल्याही बंधनात अडकून पडत नाही. पिंपळाभोवती बेशरम उगवल्याने स्वार्थी षंडशाहीचा बाजार फोफवल्याचे कवी रोखठोकपणे मांडतो. स्वातंत्र्याच्या प्रतिक्षेत अजूनही लोकशाही आहे. दडपशाही बंद होईल का ? हा प्रश्न ताजातवाना असतांना 'तिरंगा' या कवितेत परिस्थितीपुढे कवी खजील होतो.
सा-यांची नजर दिमाकात फडकणा-या तिरंग्यावर
मी मात्र तिरंगा पाहत होतो
तीन जागी 'डंड' केलेल्या मायच्या लुगड्यावर
अन् अशोकचक्र मातीत राबणा-या बापाच्या बरगड्यांवर...
कवी हा पेशाने शिक्षक आहे. पहाडातील आदीवासीबहूल विद्यार्थ्यांपुढे शिकवतांना त्यांच्या कवितेला वेगळाच अलवार नाद, गंध, स्पर्श, लय, सुर, गवसला आहे. या संग्रहातील ब-याच कविता मुक्तछंदातील असून अल्पाक्षरी आहेत. काही मुक्तकं, अभंग सदृश्य रचनांचाही समावेश आहे. सुरेश भटांच्या गझलेने उभ्या महाराष्ट्राला, साहित्य विश्वाला वेड लावले असतांना त्यात कवी बोरीकरही अपवाद नाही. तंत्रशुद्ध नसल्या तरी भावनीक पातळीवर मोठी उंची गाठणा-या रचना त्यांनी सुरेख केलेल्या आहेत. कवीचा पिंड निसर्गात वाढल्याने त्याचा प्रभाव सातत्याने कवितेत जाणवतो. कोपर्सीच्या जंगलात २७ मार्च २००१ रोजी पोलीस एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेला कथित नक्षलवादी चिन्ना वट्टे मट्टामी याचं स्वगत असणारी 'मी चिन्ना बोलतोय..!' ही कविता विदारक वास्तव मांडते. अंधश्रद्धेविरुद्ध प्रबोधन घडवणारी 'पायरीचा दगड', ढाण्या वाघाची शेतक-यांसाठी वापरलेली प्रतिमा दर्शवणारी 'वावर', मायेची व्यथा मांडणारी 'माझी माय', स्त्री-पुरुष संबंधातील तडजोड 'किणकीण', कौर्याची परिसीमा ओलांडणारी 'गुरुदक्षिना' आदी कविता वेगळ्या धाटणीच्या असून अर्थवाही व अंतर्मुख करणा-या आहेत. प्रेम, विद्रोह, शृंगार यांचा त्रिवेणी संगम आहे.
कवी नरेशकुमार बोरीकर हे अतिशय संवेदनशील आहे. मुखवट्यामागील चेहरा शोधण्याची व ओळखण्याची प्रतिभा त्यांना सभोवतालच्या वातावरणाने दिली आहे. हा संग्रह त्यांनी आपल्या दोन्ही बहीणींच्या 'उपाशीपोटी केलेल्या जीगरबाज संघर्षास...' अर्पण केलेला आहे. यातील बरीच कविता कविच्या जगण्यातली खदखद आहे. त्यातून बोध घेवून कवी लिहतो,
मी जराशी घेतली ही आसवे डोळ्यामध्ये...
का कशी पण पेटली ही आसवे डोळ्यामध्ये...
प्रस्तुत कवितासंग्रहाला प्रसिद्ध कवी, चित्रपट दिग्दर्शक द्यानेश वाकुडकर यांची दखलप्राप्त प्रस्तावना लाभली आहे. संग्रहाचे आकर्षक मुखपृष्ठ कवी बंसी कोठेवार यांनी कलात्मकतेने साकारले असून संग्रहाच्या आतील कवितांना देखील रेखाचित्राद्वारे आटोकाट न्याय दिला आहे. कवी नरेशकुमार बोरीकर यांनी जे उघड्या डोळ्यांनी जगलं, भोगलं, अनुभवलं ते अस्सलपणे अभिव्यक्त केले आहे. ख-या अर्थाने वेदनेचा तळ बहरवणारी ही कविता आहे. मराठी कवितेला समृद्ध करण्यासाठी हा अक्षय संग्रह 'दाखल' झाला आहे. रसीक, वाचकांनी आवर्जून वाचावा, कारण यातील कविता 'खारीज' होणे शक्य नाही एवढं हमखास...!
-अविनाश पोईनकर,
रा.बिबी, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
संपर्क :- ७३८५८६६०५९
==========================
कवितासंग्रह : दाखल खारीज
कवी : नरेशकुमार बोरीकर
प्रकाशन : संवेदना प्रकाशन,नागपूर
मुखपृष्ठ : बंसी कोठेवार
मुल्य : १२० रुपये
पृष्टे : ८०
===========================

खुप सुरेख वेध लिहलस अवी दा..!
जवाब देंहटाएं