रविवार, 22 जून 2025

दंडकारुण्य : जंगलनोंदीच्या वेदनेचा हुंकार









 - डॉ प्रभाकर शेळके,

 जालना 











कवीस्नेही सन्मित्र, मुक्त पत्रकार, आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रात सामाजिक सृजनशील युवा कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांची दंडाकारूण्य कविता वाचून या समकालीन वास्तवात आजही आदिवासींच्या जगण्याचं हे दंडकारण्य प्रचंड भयावह आहे. इथल्या श्रेयवादाचे भोगवाद्यांच्या मतांचे खंडण मंडण करीत ही कविता संयत खिन्नता पेरत येते. आदिवासींच्या आजच्या विकासाचे कागदीये भेंडोळे आपल्या तोंडावर फेकते. या गाभाडलेल्या व्यवस्थेला प्रश्नाकिंत जाब विचारणारी ही कविता आहे. तोंडावर एक पोटात मेख, जबानीला नेक अशी ही कविता निर्लेप नितळ व्यक्त होते. 


आदिवासी कवीश्रेष्ठ वाहरू सोनवणेभाऊ पाठराखणीत लिहितो, "अविनाश पोईनकर यांच्या कविता मानवी चेतना जागवणाऱ्या व आदिवासींच्या सुख समृद्धीचा ठेवा जपणाऱ्या आहेत. प्रस्थापित व्यवस्थेवर प्रहार करत त्यांची कविता अनेक जखमा घेऊन जगताहेत. या कवितेच्या पानोपानी जखमांचा चित्कार ऐकू येतो.आदिवासी जीवन किती भयावह आहे, याचं चित्र त्यांच्या कवितेतून स्पष्ट होतं. अशा जखमा घेऊन जगणारा हा आदिवासी या भारत देशाचा नागरिक आहे. प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाने आपले जीवन जगण्याचा संविधानिक अधिकार आहे." ही अतिशय सखोल चिंतन दर्शवणारी गोष्ट आहे. आदिवासींच्या सर्वहारा वेदनेचा हुंकार आता या दंडकारूण्याच्या निमित्ताने बाहेर येतो आहे.


युगानुयुगांच्या आदिम जगण्याला अजून ही या प्रवाहात सामील होऊ दिले नाही. कसे जगावे कसे जगू नये हा प्रश्न आदिवासींचा नाहीच, ती जल-जंगल-जमीन यातचं आदिम होऊन राहावी. आदिवासींचे शोषण करणारी जमात ही जन्माला आलेली आहे. या भोगवादी घाणेरड्या प्रवृत्तीला ही कविता अतिशय ठणकावून कल्लोळीत करते. तर वंचित आदिवासींच्या जखमळलेल्या जगण्याचे प्रतिबिंब, जगण्या-मरणाचा आवाज कायमच दाबल्या गेलेला आहे. साहित्य या अंगाने थोडेच बारूद उठले. कंपुशाहीच्या बुजगावण्यात, कुणी दखल घेतलीच नाही. पण ही कविता अभुजमाड, दंडकारण्याची सम्यक विचारांची बांधिलकी ठेवून या मुक्त व्यक्त भटकंतीत या आदिवासींच्या जगण्याचा हक्क, त्या हक्काची गळचेपी, या दंडकारण्यातला दंडक राक्षस, आजचा काॅपर्रेट जगाचा भयकारी राक्षस आदिवासींचे दमन करतो आहे. जल-जंगल-जमीन यासाठीचे झगडे, आंदोलनाचे दिखाऊ पगडे, मग यात खोटे-नाटे गुन्हे दाखल करायचे आणि स्वार्थ साधून घेयाचा, बळाचा वापर करून खिरापत वाटावी अशी धेडगुजरी खैरात, आदिवासींचे विस्थापन ही खरी दुःखरी सल या कवितेने सखेद मांडली आहे. ती अशी;

"आदिवासी 

आम्ही साधन झालोय

सरकार आणि संस्थांसाठी

आम्ही संशोधन विषय 

विद्यापीठ आणि प्राध्यापकांसाठी

आम्ही प्रयोगभूमी 

शासकीय योजनांसाठी

आम्ही मागास बिचारे

शहरातल्या भांडवलदारांसाठी

आम्ही अडगळ 

कंपन्या उद्योगपतींसाठी

आम्ही जंगलाचे राजे

आताशा झालोय बैल

इथल्या व्यवस्थेने 

काळोख पेरलाय शेकडो मैल" (पृ.१२)


हा आदिवासींच्या दुःखाचा आत्महुंकार आहे. अविनाश पोईनकर यांनी आपल्या सृजनशील आत्मानुभूतीनी हे जगणं अनुभवलं. या कवितेचा मर्मग्राही अनुबंध म्हणजे आत्मिक समाजभान देणारी ही कविता. स्वातंत्र्यापुर्वी अनादी अनंत यातना भोगल्या. जंगलाने जगणे शिकविले. भाषेत शिव्या नाहीत ओव्या आहेत. संस्कृतीची नाळ तुटू देत नाही. याच संस्कृतीचा या व्यवस्थेने भांडवल केले. सारं काही निसर्गाला मागितले. याचं पिठ माग्यानेच भिक मागीतली आमच्या संस्कृतीची.


"आम्ही निसर्गाशिवाय

कधीच मागीतलं नाही काही कुणाकडे

मुठभर दानत दाखवून

आम्हाला कोण करू पाहतोय विभक्त?(पृ.१३)


या कवितेचा आगाज हा अतिशय मौलिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा, लक्षवेधी ठरणारा आहे. आजच्या ग्लोबल युद्धात सर्वहारा सामान्य आदिवासींच्या जगण्याला मुखर करताना, टु-व्हीलर, फोर व्हीलर, बंगल्यावर बंगला, गावं खेड्यात स्मिटाळले रस्ते, त्यांच्या डोंगर वस्तीला अजून ही साधी रानवाट नाही. साऱ्याच सुखाच्या मखमली वर्दळी. तरीही आदिवासींच्या जमिनींवर अतिक्रमणीय चटका मारणारी ही भांडवलशाही अर्थव्यवस्था यामुळे त्यांना अजूनही सुखाचा घास नाही. कुणी त्यांची कदर करत नाहीत. बकऱ्या, कोंबड्या, लाहूरी तितरं, घोरपडी, ससे, डुक्कर, मोर त्यांच्या अंगणात आहे. दारा-बांधावर गोरगा, ताडीची झाडं आहेत. ही त्यांच्या श्रीमंतीची गोष्ट आहे. ज्या मातीत ते जन्मले त्या मातीशी इमान राखून ते जगतात. मातीशी बेईमानी नाही. पण आज त्यांच्या शेती-मातीवर डोळा ठेवून त्यांच्या वाटाचं बंद करत आहेत. हे वास्तव ही कविता सांगून जाते. दिवसा ढवळ्या त्यांच्या 

माय-बहिणीवर अत्याचार करणारे मोकाट वळूगत सुटून येत आहेत. त्यांच्या मुक्त जगण्याची दमकोंडी उजागर करणारी ही कविता संयत मनोभूमिकेतून येते.


"जंगलाच्या भरोशावर 

शहरे विकसित झाली

अन् मुलनिवासींच्या वाट्याला आलं 

पिढ्यानपिढ्याचं मागासलेपण"


या कवितेत माणसात मिसळा, वेदनेचा हंबरडा, संस्कृतीचा खोल डोह, निसर्गात दंग झालेले हे वारकरी, दुःखाच्या दारिद्र्याचं आदिम जंगल, जंगल स्वांतत्र्याची लढाई.. म्हणून कवी म्हणतो,


"इथल्या श्रीमंतीची तुलना

होऊ शकतं नाही

कुठल्याही फोर्ब्स यादीतील अब्जाधीशांशी!"

(पृ १६)


ही कविता इतकी प्रखरतेने बोलते, आपण या माणुसकीचे देणे लागतो. आपण ही माणसं जपली पाहिजे. ते अज्ञानी आडानी शि‌क्षणापासून कोसो मैल दूर. त्यात या दंडकारण्याला नक्षलवादींनी काबिज केले आहे. अबुजमाड दंडकारण्याचा भाग असल्याने माओवाद्यांचा तो गडकोट आहे. सर्वहारा आदिवासी जमात फुकट मारल्या जाते आहे. निष्पांपाचा बळी जातांना ही कविता मनाला बोचणारी, टोचणारी सल म्हणजे ही जंगलाच्या रक्तबंबाळ आदिमांचा टाहोच आहे. रामायणापासून आजतागायत जटायूची जशी अवस्था झाली होती तशीच अवस्था आज आदिवासींची आहे. भारताचा दक्षिण भूभाग, सीमावर्ती भागातील घनदाट जंगल म्हणजे दंडकारण्य. उच्च प्रतीचे खनिजे व नैसर्गिक साधनसंपत्ती हा धनाड्याचा उद्योजकीय ठेवा. विश्व भारताचे अमेझाॅन जंगल म्हणजे दंडकारण्य, ही उत्पत्तीची श्रीमंत शृंखला असल्याने या आदिवासींच्या छळवादांचा कुणी विचार करणार आहेत का? फक्त संशोधक, अभ्यासक म्हणूनच मिरवणार आहात?


या रानटी अदिमांना आम्ही सारं शिकवलं. खायला, हागायला, मुतायला, नागड्या अंगावर खपल्या नेसल्या. आता ह्यांना कपडे घालायला शिकवले. असे काही जणू प्रदर्शनच भरवून भरवून आदिवासींचं भांडवल करणारी व्यवस्थाही आहे. या साऱ्या राष्टानात आमचे पारंपरिक प्रवाह मुळासकट वाहून गेले, ही खंत कवीने व्यक्त केली आहे.

विकासाच्या नावाखाली इथं बेमालूम बेईमानी चालू आहे.


"विकास कुणाच्या भरोशावर कुणाचा ? 

सारेच वितळून नेतील असा पुतळा मेनाचा

कोपा गावळेचा रस्ता

कागदावर हसतो आहे

बिनविषारी धामण 

इथे नागासारखी डसते आहे " (पृ.४८) 


दगडाने नाळ ठेचून जन्म देऊन कामाला लागलेली माय माऊली जन्मभर मरण यातना ठेचते आहे. आम्हाला तुमची पुरणपोळी नको, या नक्षल्यांच्या गोळी पासून वाचवा. बुकलू, अनिता, रमेश, शांती यांच्या व्यथा-वेदनेचा मलम होऊन जागर उजागर केला आहे. सायबी, सांगतो होऊन गेलेल्या कथा पण व्यथा संपल्या नाहीत.. कुणी इव्हेंट मॅनेजर येतो राजधानीतून, करपलेल्या अगतिक पोटाचा सौदा, विकास, उध्दाराच्या घोषणा अन् ठळक फोटो त्यांचे. यावर कुणीच बोलत नाही. असा हा लोकशाहीचा चौथा स्तंभ चोथा झालेला. हे आदिवासीचे जीवनदर्शन नाही तर हा भंयकर व्यथा, वेदनांचा टाहो आहे. कवी अविनाश पोईनकर प्रचंड निर्लेप नितळ अभिव्यक्तीने मनोगत व्यक्त करतात, 'मी ही कविता स्वानंद सुखासाठी लिहिली नाही. माझ्या स्वतःच्या मतलबापुरती ती मर्यादित राहू नये. भावगर्भ वास्तव सोडून वृत्त-छंदाच्या खिलवाडात बंदिस्त होऊ नये. गाथा ते ग्रामगीता संतांनी जो मानवतावाद पेरला ते जर आपल्या कवितेतून तसूभरही उगवतं नसेल तर आपण काय सामाजिक चिंतन करतो? प्रत्येक कवी आणि कवितेची 

उत्तरदायित्वाची भूमिका असते. हे जगणे, भोगणे व अनुभवणे हे समाजभान ठेवून म्हणून कवी, लेखकांने कुणाच्याच गुलामीत व भयग्रस्तेत असता कामा नये' (पृ. ७) ही ठाम भूमिका घेऊन एका नैतिक जबाबदारीने ही कविता दंडकारण्यातलं आजचं वास्तव मांडते. आपल्या समाजमनावर हा काळोखी विळखा भंयकर होणार, याचं

जणू भाकित ही कविता निडरपणे करते आहे. जसे,


"धाक बंदुकीचा | दंडकारण्यात |

कोणत्या युद्धात | कोण आहे |

कधीही कुणाला | बोलू नये काही |

मुकी लोकशाही | चिरडते |

आदिमांचे जग | समजेना कुणा |

अन्यायाने माना | चिरडल्या | (पृ.५४)


असा सखेद प्रश्न विचारत ही कविता संयत भंयकर इशारा देऊन जाते. ही कविता ठळक घटनेच्या नोंदी देते. अनामिक आदिवासींना बेछुटपणे मारल्या जाते. बेदखल होऊन जातात हे रानाची पाखरं.. "दंडकारूण्यमधील कविता एका अलक्षित आणि दुर्लक्षित समाजघटकांच्या जीवनस्थरांचा उद्गार आहे. रोजच्या जगण्यात येणाऱ्या असंख्य अडचणी आणि त्याचा शासन आणि नक्षलवाद यांच्याशी दुतर्फा करावा लागणार जीवघेणा संघर्ष या कवितेमधून उजागर झालेला आहे." हा अभिप्राय कवीच्या मनाची तळमळ व्यक्त करतो. लोकवाड्मयगृहाने जाणीवेने नोंद घेतली. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ अतिशय चिंतन आशय देऊन जाणारे. ही कविता म्हणजे बेदखल झालेल्या आक्रोशाचे आक्रंदन आहे. कवी अविनाश पोईनकर यांना मनस्वी शुभेच्छा.


•••


∆ दंडकारूण्य : कवी अविनाश पोईनकर 

∆ प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई 

∆ प्रथमावृती : मार्च २०२५

∆ मुखपृष्ट : सरदार जाधव 

∆ किंमत : २०० रूपये 

∆ पुस्तक परिचय : डॉ प्रभाकर शेळके, जालना 

∆ मोबाईल : 9975137337


•••


दै. आधुनिक केसरी, २२ जून २०२५

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....