रविवार, 17 अगस्त 2025

अस्मितेसाठीचा रोष, क्रोध आणि आक्रोशाची कविता : दंडकारुण्य











- दा.गो.काळे, शेगाव



अविनाश पोईनकर मुलनिवासी-आदिवासी माणसांच्या जल, जंगल व जमीन या मूलभूत हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते कवी आहेत. २०१७ साली त्यांचा 'उजेड मागणारी आसवे' हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात आपण म्हणून अभावग्रस्ततेचे प्रतिबिंब पडले होते. या असतेपणाला ओलांडून जाणारे दुसरेही जग अस्तित्वात आहे. ह्या सतत होत असलेल्या जाणिवांत 'दंडकारुण्य' तील व्यथा कुठेतरी दडलेल्या होत्या. त्याचा भावात्मक-करूणार्थ रिपोर्टाज म्हणजे ही कविता. हा रिपोर्टाज म्हणजे पत्रकारीतेतील ग्राउंड रिपोर्ट नाही. त्याला अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर एका कविने अनुभवलेला कारूण्याचा स्वर आहे. सौंदर्य गमावलेल्या लोकजीवनाचे त्यांच्या संस्कृतीचे अवशेष त्या कवितेला समृद्ध करीत जातात. कविता एकटी अनाथ कधीच नसते. तिला आपला इतिहास, संस्कृती, भाषा व समकालीन वास्तवाचे भान असते. लोकसंवेदना, वेदना आणि त्यातून आलेल्या विद्रोहाची भूमीही ती असते. आताच्या पार्श्वभूमीवर या कवितेचा विचार केला तर, 'दंडकारण्य' ऐवजी दंडक नावाचा राक्षस म्हणजे समकालीन व्यवस्थेचे प्रतीक मानता येतो. संर्वधन करणाऱ्या अरण्याऐवजी विस्थापित करणारे कारुण्य या कवितेच्या अनुषंगाने प्रतलावर आलेले आहे. त्या दृष्टीने कविने योजलेले 'दंडकारुण्य' हे शिर्षक अर्थपूर्ण आहे. या शिर्षकात कविता आणि तिच्या आशयाच्या जागा आहेत. त्या जागा शोधण्याची जबाबदारी म्हणून यातील कवी कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर कवी काय काम करीत असतो, याचे उत्तरही या कवितेतून मिळते.


कवी कवितेच्या माध्यमातून आपला म्हणून एक हस्तक्षेप नोंदवीत असतो. हा साहित्यादी कलांचा हस्तक्षेप म्हणजे मानवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कसदार असे साधन असते. प्रत्येक काळातील सामाजिक अवस्थांचे दस्ताऐवजीकरण या कृतीतून सतत होत आलेले आहे. त्यादृष्टीने सतत संदर्भांचे भान ठेवून वर्तमानकाळ उसविणारी मानवी स्थित्यंतरांची सतत प्रगतणारी ही अवस्था म्हणता येते. त्यातून समकालीन समाज व्यवस्थेचे एक प्रारूप आपल्या समोर ठेवण्याची एक जबाबदारी साहित्याने पेललेली आहे. साहित्यातील विविध सामाजिक संदर्भातून प्रकटणा-या मानवी अवस्थांमधून आजच्या वर्तमानकालीन स्थितीगतीचा, त्याच्या असतेपणाच्या दिशा कळलेल्या आहेत. या विचारांमधून आलेल्या स्वतंत्र जाणिवांनी एका व्यवस्थेने नाकारलेले माणूसपण परत मिळविलेले आहे. हा इतिहास आहे. शब्द जेव्हा नकारांचे शस्र बनतात त्यावेळी ते आपली कृतीच करीत असतात. त्यातूनच होत असलेल्या अन्यायाची, नाकारलेपणाची जाणीव निर्माण झालेली असते. म्हणून साहित्यादी कलामधील निर्मिती अभिव्यक्तीचे साधन असले तरी, त्यातून आलेल्या कृतीशीलतेत परिवर्तनाच्या शक्यता अधिक असतात. ही गोष्ट नाकारता येत नाहीत. त्या दृष्टीने या परिवर्तनशील कवितेकडे पाहता येते. कारण ही कविता शब्दांचे अर्थ उबवीत बसलेली संहिता नाही. तिचा जाहिरनामा कृतीशील अशा शब्दांत सामावलेला आहे. येथे शब्द एकटे नाहीत. सामान्य माणसांतील आवाजांच्या प्रतिध्वनीत ते आहेत. म्हणून ही कविता आहे.


"चहूबाजूंना बारमाही नद्या वाहताहेत, 

आम्हाला प्यायला पाणीच नाही. 

डोंगराआडून पायपीट करून आलोय 

खायला अन्न, झोपायची सोय नाही 

कलावंतांच्या आक्रोशाकडे केला कानाडोळा

बोलणा-यांना लावून दिलं ' ... वादी' लेबल. 

माडिया महोत्सवात 'माडीया' आलेच नाही 

तरी फरक पडत नसतो कुणालाही."


असे भयकोंडीचे वास्तव व्यवस्थेने निर्माण केले आहे. आम्ही येथील पर्यावरण वाचवतो. येथील निर्मितीच्या स्रोताला जपणारे हात आमचे आहेत. तरीही त्याचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य आमचेकडून हिसकावून घेतल्या जात आहे. तुमच्या मुख्य प्रवाहात आमच्या संस्कृतीचा लोप होत आहे. आमच्या हस्तक्षेपाच्या अधिकाराचे हनन होत आहे. आमच्या संदर्भात आवाज उठवणा-या कलावंतांचा आक्रोश व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वादाचे लेबल लावून बदनाम केल्या जात आहे. ही आजची स्थिती आहे. वनवासी प्रश्नांना साद घालणारे आवाज अवरूद्ध करण्यात आले आहेत. वनवासींना मुख्य प्रवाहात आणणे म्हणजे, त्यांची संस्कृती, त्यांच्या बोली, रोजगार निर्माण करणाऱ्या जंगलाचे वैभव, वनौपजाचे बाजारीकरण करणे म्हणजे, त्यांच्या परंपरागत खाद्यसंस्कृती नाकारून प्रत्यक्षात भूकेचा अधिकार हिरावून घेण्यासारखा आहे. कारण परंपरागत अन्न व्यवस्था नाकारणे म्हणजे जाणूनबुजून कुपोषणाला बळी पाडण्यासारखे आहे. हा सगळा फंडा तेथील खनीज संपत्ती लुटण्यासाठी चाललेला अट्टाहास आहे. सरळ सरळ भांडवली व्यवस्थेला, कार्पोरेट कंपन्यांना आपली स्पेस निर्माण करून देणे होय. त्यातून आदिवासींच्या विस्थापनाचे मार्ग जातात. व्यवस्थेच्या ह्या विकासाच्या संकल्पनेत आमच्या मूलभूत अशा जीवनजाणिवांना मुठमाती देणे आहे. निसर्गाच्या चलनवलनात त्यांच्या असतेपणाचे प्रतिबिंब पडलेले आहे. ह्या गोष्टी विसरता येत नाही. विकासाच्या मुख्य प्रवाहात लोप होणारे अस्तित्व त्यांना जगू देणारे नाही.


"आम्ही पूजतो नद्या, नाले, डोंगरांना.

आम्ही पूजतो पाने-फुले-फळे-झाडांना. 

आम्ही पूजतो निर्मिकाच्या सजीव सृष्टीला. 

आम्ही पूजतो दैवत म्हणून आमच्या पूर्वजांना. "


ह्या कवितेचे अर्थ मुख्य प्रवाहातील तथाकथित दैववादी संस्कृतीला नाकारणारे आहे. सृष्टीत जिवंत असणारे सगळे स्रोत म्हणजे त्यांच्या जीवनाकडे जाणारे मार्ग आहेत. ते अदृश्य नाहीत. त्यांच्या निर्मिकाच्या संकल्पना सगुण अशा परंपरांना जवळ जाणाऱ्या आहेत. महात्मा फुले सारख्या सुधारकांच्या विचारांची मूळं आदिवासींच्या संस्कृतीत सापडतात असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. पोथ्या-पुराणांमधून रचलेल्या मिथकांऐवजी आपल्या पूर्वजांना दैवत मानणारी संस्कृती नक्कीच नव्या विचारांची असेल यात शंका नाही. परंतु आज व्यवस्थेने मांडलेला खेळ आपल्या हक्कासह जगणे हिसकावून घेणारे आहे. आज त्यांच्या वाट्याला काय आले आहे?


" जीव मुठीत कैद असतो 

मांडू शकत नाही फिर्याद 

मागू शकत नाही दाद 

सभोवताल विणलयं खब-यांचं जाळं " 


ह्या जीवघेण्या वास्तवातून आजचा आदिवासी काफीला जात आहे. आदिवासी म्हणून त्यांचे संविधानिक अधिकार हिरावून घेतल्या गेले आहेत. त्यांच्या जगण्यासाठीच्या मूलभूत हक्कावरच टाच येत असेल तर, त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पना कोणत्या व्यवस्थेने अवरूद्ध केल्या आहेत. दगडाने ठेचलेल्या नाळेसारखा त्यांचा जन्मच ठेचल्या जाणारी परिस्थिती आहे. प्रत्यक्षात जीवनाची होळी झालेली आहे. ही गोष्ट विसरता येत नाही. त्यासाठी लढण्याचा आशावादही त्यांच्यात नाही, असे म्हणता येत नाही.


" हमारे गाव में हमारा राज

जल-जमीन-जंगल हमारा है l "

हा आशावाद जिवंत असला तरी तो केवळ हद्दीपुरताच ऐकू येतो. त्यांच्यासाठी प्राणपणाने काम करणाऱ्या अरूंधती राॅय, महेश राऊत सारख्या समाज सेवकांना देशद्रोही ठरवले जाण्याची परिस्थिती आहे. या अवकाशात जगणाऱ्या बायांचे दुःख पिळवटून टाकण्यासारखे आहे. आपण जगत आहोत की, नाईलाजाने हे जगणं ओढत आहोत. या सगळ्या वेदनांची लक्तरे या कविने वेशीवर टांगली आहेत. 


" बाळंतपणाच्या वेदनांनी जितकं सोललं शरीर

त्याहून दुप्पट रोजनिशी सलत राहते 

कुरूप झालेल्या पायात खंडीभर काटे 

रस्ते हरवलेले पाय आपोआप फसतात रोवणीत "


तसे या व्यवस्थेच्या रोवणीत सगळ्या आदिवासींचे जगणे फसले आहे. त्यांना बाहेर काढण्याचे रस्ते त्यांच्यापर्यंत जावू देणारे नाही. तरीही एक कवी म्हणून, सामाजिक बांधिलकी समजून एक आपला हस्तक्षेप ठेवण्याचा प्रयत्न हा कवी करतो आहे. हा हस्तक्षेप फक्त वरवरचा नाही. हा बंद पुस्तकातील आवाज नाही. हा कवी म्हणजे व्यवस्थेकडे निर्देश करणारे उघडे पुस्तक आहे. त्यांच्या जगण्यात ह्या कवितांचा अंश सापडतो. त्या दृष्टीने ही कवितांची वही कोरडी नाही. त्यांच्या जगण्याला समांतर गेली आहे. कवितेसाठी खूप खूप शुभेच्छा.



‘दंडकारुण्य’: अविनाश पोईनकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई, मार्च-२०२५

मुखपृष्ठ : सरदार जाधव 

किंमत २०० रु. संपर्क : ८४५४०४९०३६

--------------------------------

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

दंडकारण्यातील आदिवासी बांधवाच्या जीवनाचं खरंखुरं धगधगत वास्तव : दंडकारुण्य

- राजू गरमडे, चंद्रपूर कवीमिञ, मुक्तपञकार, सामाजिक युवा कार्यकर्ते, आदिवासी भागात जाऊन कार्य करणारे अविनाश पोईनकर एका कार्यक्रमामध्ये भेटले....