डांबरी रस्त्याने पोहोचता येते शहरापर्यंत
गावात जायला पायवाटा
कंबरभर निळ्याशार पाण्याचे नाले
चढ उतार
सभोवती घनदाट जंगल..
जंगलाच्या भरोवशावर
शहरे विकसित झाली
आणि मुलनिवासींच्या वाट्याला आलं
पिंढ्यानपिढ्याचं मागासलेपण
दुर्लक्षित राहीलेल्या जगाला
अतिदुर्गम म्हणून केलं शिक्कामोर्तब
आणि अतिरिक्त पगार घेवून
सेवेच्या गुंतागुंतीच्या कसे करतो बाता ?
कधीतरी गावात या
एकमेकांत मिसळा
वेदनेचा हंबरडा सहज ऐकू येईल
संस्कृतीच्या खोल डोहात
गौणउपजातील जीवनसत्वात
दुरवर
देवाजी, लालसू, कन्नाचा
समृद्ध आवाज ऐकू येईल...
निसर्गात दंग झालेले वारकरी
दु:खाच्या दारिद्र्यरेषेतील आदीम
जंगल स्वातंत्र्याची लढताहेत लढाई !
इथल्या श्रीमंतीची तुलना
होवू शकत नाही
कुठल्याही फोर्ब यादीतील अब्जोधिशांशी !
- अविनाश पोईनकर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें