(ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हातात 'दंडकारुण्य' कवितासंग्रह)
- डॉ.राजेंद्र मुंढे, वर्धा
अविनाश पोईनकर यांचा 'दंडकारुण्य' हा कवितासंग्रह म्हणजे आदिवासी जीवनाच्या विस्थापनाच्या, अस्मितेच्या आणि संघर्षाच्या विविध पैलूंना कवितेतून भिडवणारा दस्तऐवज आहे. ही कविता केवळ प्रखर राजकीय विधान किंवा भावना-आवेशाच्या उबळीतून साकारलेली नाही. ती प्रत्यक्ष अनुभवांच्या खाचखळग्यांतून जन्मलेली आणि जगण्यातूनच उमटलेली आहे. मध्य भारतातील दंडकारण्य या प्रदेशात कवीने सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केलेले वास्तवाचे निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून निर्माण झालेला संवेदनशील काव्यप्रपंच म्हणजे हा संग्रह आहे.
दंडकारण्य हा केवळ एक भौगोलिक भूभाग नाही. तो आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अस्तित्वाचा केंद्रबिंदू आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या सीमांवर पसरलेल्या या घनदाट जंगलात माडिया-मुरिया यांसारख्या अनेक आदिम जमाती आजही आपल्या भाषा-संस्कृतीसह जगत आहेत. परंतु या जीवनप्रणालीवर भांडवलशाही आणि विकासाच्या नावाखाली सुरू झालेल्या आक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला आहे. खाणी, धरणं, महामार्ग, पोलिस-नक्षलवाद संघर्ष या सर्वांच्या कात्रीत आदिवासी जीवनपद्धतीच्या मूलगामी प्रश्नांची धग अविनाश पोईनकर यांच्या कवितेत स्पष्टपणे जाणवते.
'आदिवासी आम्ही साधन झालोय' ही कविता आदिवासींच्या वस्तुनिष्ठ शोषणाची नेमकी मांडणी करते. संशोधन, योजना, नोंदी आणि विकास प्रकल्पांच्या नावाने आदिवासी समाजाच्या मुळावर उठलेली ही यंत्रणा केवळ त्यांना उपेक्षित करत नाही, तर त्यांच्या स्वातंत्र्यालाही गिळंकृत करते. पोईनकर लिहितात
"आम्ही जंगलाचे राजे
आताशा झालोय बैल
इथल्या व्यवस्थेने
काळोख पेरलाय शेकडो मैल".
ही केवळ शोकात्म अभिव्यक्ती नाही, तर व्यवस्थेच्या मूलभूत असंवेदनशीलतेवर केलेला मर्मभेदी प्रहार आहे.
या कवितांमध्ये एक विशिष्ट 'जाणिवेची सातत्यशीलता' आहे. ही जाणीव फक्त सामाजिक अस्मितेपुरती मर्यादित नसून ती सांस्कृतिक, नैतिक आणि निसर्गाशी असलेल्या जैव संबंधांपर्यंत पोहोचते.
"आम्ही आमची भाषा बोलतो
त्यात शिव्या नाहीत
ओव्या आहेत केवळ प्रेमाच्या"
अशा पंक्ती आदिवासी संस्कृतीचे सभ्यतेचे परिमाणच बदलून टाकतात. ही कविता केवळ आदिवासी जीवनाचे निरीक्षण नाही, तर जीवन जगण्याचा ठाम आग्रह आहे. त्यामुळेच ती उथळ सहवेदना किंवा साहाय्याच्या वरपांगी भूमिकेतून लिहिलेली वाटत नाही.
या संग्रहातील कविता कधीकधी विनोदी उपरोधाच्या पातळीवर जातात. 'माझ्याकडे आहे / मला उपाशी ठेवणार नाही इतकी माती' ही कविता आर्थिक तुलनांमधून उद्भवणाऱ्या समृद्धीच्या संकल्पनांनाच छेद देते. यातून नुसती सामाजिक टीका होत नाही, तर 'अर्थ' या संकल्पनेचं पुनर्मूल्यांकन सुरू होतं. शहरी विकास, मुख्य प्रवाह आणि यंत्रणांचा भाष्यात्मक विनोद कवीने ओढून ताणून आणलेला नाही, तो अनुभवलेला आहे.
'दंडकारूण्य' हा संग्रह वाचताना वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, व्यंकटेश आत्राम, उषाकिरण आत्राम, कुसुम आलाम, विनायक तुमराम आणि प्रभू राजगडकर यांच्यासारख्या आदिवासी कवींच्या कवितांची आठवण प्रकर्षाने होते. या साऱ्यांच्या लेखनात आपापल्या मातृभूमीचा, बोलीभाषेचा, परंपरेचा आणि विस्थापनाच्या भीषणतेचा सूर आहे. या परंपरेशी पोईनकरांची कविता थेट संवाद साधते. विशेषतः प्रभू राजगडकर यांच्या कवितांतील प्रतीकात्मकता, आदिवासी जीवनातील अंतःस्थ संघर्ष आणि आत्मप्रतिमांच्या पुनर्रचनेचा पदोपदी जाणवणारा प्रयत्न 'दंडकारूण्य'मध्येही दिसून येतो. राजगडकर जसे 'वाटेवरची पालखी' म्हणताना संपूर्ण विस्थापनाचा आत्मनिवेदनातून वेध घेतात, तसाच आत्मा पोईनकर यांच्या 'जंगलनोंदी'त आहे.
या कवितांमध्ये लयबद्धता किंवा पारंपरिक छंद रचनेचा आग्रह नाही. कविता जशी आहे, जशी उमटली आहे, तशीच ठेवण्याची भूमिका कवीने घेतली आहे. त्यामुळेच ती कृत्रिमतेपासून मुक्त आहे. 'बोट कधीचेच कापून टाकलंय आम्ही / आता बोटावरच्या शाईवर उरला नाही विश्वास' या ओळींमध्ये निवडणूक प्रक्रिया, लोकशाही आणि विकास यांचा अनास्थेने आलेला कंटाळा आहे. पण हा कंटाळा हतबलतेचा नाही; तो प्रश्न विचारणाऱ्या, पिचलेल्या पण अजूनही सामर्थ्यशाली असलेल्या जमातीचा आहे. 'अरुंधती रॉय' आणि 'महेश राऊत' यांच्यावर लिहिलेल्या कविता ही कवितेतील एक वेगळीच वैचारिक परिपक्वता दर्शवतात. सामाजिक कार्यकर्त्यांविषयी असलेला आदर आणि व्यवस्थेच्या दडपशाहीविरुद्ध असलेला संताप या दोन्ही गोष्टी येथे समांतरपणे नोंदल्या जातात. या कविता फक्त कारुण्यावर आधारित नाहीत; त्यात तीव्रता, रोष आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली विवेकपूर्ण संवेदना आहे.
कवीची भूमिका आणि संपादकीय नोंदी यामधून पोईनकरांच्या कवितेचा प्राण अधिक स्पष्ट होतो. ही कविता म्हणजे गोंदण आहे, वेदनेचं, अस्मितेचं आणि जिवंतपणाचं. 'दंडकारूण्य' केवळ वाचायचं नसून जगायचं आहे. ही कविता आपल्याला जंगलात घेऊन जाते, तिथल्या आवाजाशी जोडते आणि शहरात बसलेल्यांना आपला नैतिक आधार तपासायला लावते. अशा कविता आपल्या कवितेच्या व्याप्तीत आदिवासी आवाजासाठी जागा निर्माण करतात. त्या कवितेला एका नैतिक आणि भौगोलिक सीमारेषेपलीकडे घेऊन जातात. म्हणूनच 'दंडकारूण्य'चा आवाज ऐकणं, समजून घेणं आणि त्याच्या प्रतिध्वनीवर चिंतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
दंडकारूण्य । अविनाश पोईनकर
पाने : ९२ । किंमत : २००/-
मुखपृष्ठ : सरदार जाधव
लोकवाड्मय गृह प्रकाशन, मुंबई
••••

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें